पावसाळ्यातील अडचणींबाबत विज मंडळ अभियंत्यांना तातडीच्या नियोजनाचे आमदार समीर कुणावार यांचे निर्देश
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
15 Jun 2026, 8:16 AM
किशोर मुटे- वर्धा जिल्हा प्रतिनिधी
वर्धा - आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हिंगणघाट तसेच लगतच्या समुद्रपूर तालुक्यातील वीज व्यवस्थेची सज्जता, विविध विकासकामांचा आढावा आणि नागरिकांना अखंड व सुरळीत वीजपुरवठा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (MSEB) चे अभियंते, उपअभियंते व सहाय्यक अभियंते यांची महत्त्वपूर्ण बैठक आमदार समीर कुणावार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाली.
बैठकीदरम्यान दोन्ही तालुक्यांतील शहरी व ग्रामीण भागातील वीजपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजनांचा सखोल आढावा घेण्यात आला. नवीन सबस्टेशन उभारणी, वाढत्या वीज मागणीच्या अनुषंगाने ट्रान्सफॉर्मर क्षमतेत वाढ, देखभाल व दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करणे तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य तांत्रिक अडचणींना तातडीने सामोरे जाण्यासाठी आवश्यक नियोजनावर विशेष भर देण्यात आला.
पावसाळ्यात मुसळधार पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे झाडे कोसळून विद्युत पोल व वीजवाहिन्यांचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता, अशा घटनांमध्ये तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेऊन वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, साहित्य व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना आमदार समीर कुणावार यांनी संबंधित अभियंत्यांना दिल्या. तसेच संवेदनशील ठिकाणांची पूर्वतयारी करून संभाव्य अडचणी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यावरही भर देण्यात आला.
यावेळी नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत वीज समस्यांचा सामना करावा लागू नये, तक्रारींचे त्वरित व प्रभावी निराकरण व्हावे तसेच वीज विभागाची यंत्रणा अधिक जबाबदारीने व तत्परतेने कार्यरत राहावी, यासाठी आमदार समीर कुणावार यांनी स्पष्ट निर्देश दिले. जनहिताच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीच्या शेवटी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देश आमदार समीर कुणावार यांनी दिले. तसेच जनतेच्या अपेक्षांनुसार तत्पर, परिणामकारक आणि लोकाभिमुख सेवा देण्यास प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जनहिताला केंद्रस्थानी ठेवून मूलभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून, नागरिकांना दर्जेदार व अखंड वीजसेवा उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी करण्यावर यावेळी भर देण्यात आला. यावेळी बैठकीला हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीणचे सर्व अभियंते, उपअभियंते, सहाय्यक अभियंते उपस्थित होते.
Post Views: 14