नंदूरबार: विकास कामाच्या मुद्द्यावरून राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच महाविकास आघाडीलाही चॅलेंज केलं. राज्यातील उद्योग गुजरातमध्ये जात आहेत. शेतकऱ्यांकडे लक्ष नाही, असे आरोप आमच्यावर केले जात आहेत. माझं त्यांना चॅलेंज आहे. त्यांनी कड्याला कडं लावावं. कोण तुमचा बहाद्दर माणूस आहे त्याला व्यासपीठावर उभं करावं. तुमचे अडीच वर्ष आणि आमच्या चाळीस दिवसांचा हिशोब घ्यावा. त्याच्या पाचपट कामे या सरकारने केले नसतील तर हे सरकार पायउतार व्हायला तयार आहे, असं आव्हानच गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना दिलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नंदूरबारच्या दौऱ्यावर आहेत. याप्रसंगी विविध कामांचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. आमच्या बाबतीत अफवा फैलवल्या जात आहेत. 40 पैकी 22 आमदार संपर्कात आहेत, शिंदे साहेबांबरोबर गेलेले आमदार नाराज आहेत, असं सांगितलं जात आहे. ते तुमच्या संपर्कात आहेत तर आहेत कुठे? असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला.
आमच्यावर तुम्ही आरोप करता. 35 वर्ष आयुष्य शिवसेनेत घातलं. या नंदूरबारपर्यंत आलेला हा गुलाबराव पाटील आहे. धुळ्यात शाखा निर्माण करणारा हा गुलाबराव पाटील आहे. मर्दांची संघटना सांगणारा हा गुलाबराव आहे. खेड्यापाड्यात आम्ही शिवसेना उभी केली. पण मुंबईतील चापलूस सांगतात शिवसेनेशी आम्ही गद्दारी केली. शिवसेनेशी आम्ही गद्दारी केली नाही. शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. माजलेल्या बोक्यांना घरी बसवले, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
तुम्ही आमच्यावर आरोप करू नका. आमच्यावर आरोप करण्यापेक्षा तुम्ही आत्मपरिक्षण करा. 55 आमदारांमधून 40 आमदार फुटून गेले. तुम्ही कुठे तरी कमी पडला. ग्रामपंचायतीचे दोन सदस्य फुटले तर रात्रभर झोप लागत नाही. और चालीस बाघ गये भैय्या, अप्प टप्पा चप्पा हो गया तरीही यांच्या लक्षात आलं नाही, असा हल्लाही त्यांनी चढवला.
Post Views: 210
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay