पंतप्रधानांना इतिहास कळत नाही; राहुल गांधींचा जोरदार पलटवार


 संजय देशमुख  11 Feb 2022, 8:53 PM
   

पणजी : गुरुवारी म्हापसा येथील निवडणूक प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस तसेच पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यावर टीका केली होती. नेहरु यांनी गोव्याला वार्‍यावर सोडले असे म्हणत, देश स्वतंत्र झाल्यावर गोव्याला स्वतंत्र होण्यास 15 वर्षे का लागले, अशी टीका मोदी यांनी काँग्रेसवर केली होती. मोदी यांच्या टीकेचा समाचार घेत आज राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना इतिहास कळत नसल्याची टीका करत प्रतिहल्ला केला. तसेच त्यावेळी दुसर्‍या महायुद्धानंतर काय परिस्थिती होती याचे आकलन त्यांना नसल्याचे देखील राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी आज प्रचार सभेसाठी गोव्यात दाखल झाले आहेत. त्यांनी मडगाव येथे पत्रकार परिषदेमध्ये काल नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केलेल्या टिकेचा समाचार घेतला. यावेळी राहुल म्हणाले, त्यावेळच्या इतिहासाबाबत पंतप्रधान यांना माहिती नाही, त्यावेळी दुसर्‍या महायुद्धानंतर काय चालले होते या गोष्टीला ते समजून घेत नाहीत. असे मुद्दे काढून ते पर्यावरण आणि रोजगार अशा मूलभूत प्रश्नांवरुन गोव्यातील जनतेचे लक्ष हटवत आहेत.
गोव्यातील निवडणूक प्रचारासाठी एका दिवसाच्या दौर्‍यावर आलेल्या राहूल गांधी यांनी गोव्यात काँग्रेस सर्वाधिक जागांवर निवडणूक येईल तसेच निवडणुकीनंतर कोणत्याही आघाडीची आवश्यकता भासणार नाही, काँग्रेस बहुमत प्राप्त करेल असे मत राहूल गांधी यांनी व्यक्त केले. 
म्हापसा येथील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस हा गोव्याचा शत्रू असल्याचे विधान केले होते. काँग्रेसने गोव्याशी शत्रू प्रमाणे व्यवहार केला आहे. काँग्रेसने कधीच गोव्यातील राजकीय, सांस्कृतिक आणि युवकांच्या अपेक्षांना समजून घेतले नाही. यावेळी मोदी म्हणाले होते अशा अनेक ऐतिहासिक घटना आहेत ज्यांना काँग्रेसने लपवून ठेवले आहे. देश स्वंतत्र झाल्यावर देशाकडे स्वत:ची सेना होती, नौसेनेची ताकद होती. तरी देखिल काँग्रेने गोव्याला स्वतंत्र केले नाही अशी टिका मोदी यांनी केली होती.

    Post Views:  271


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व