लसीकरणाचा वेग वाढवा : मुख्यमंत्री
मंत्रिमंडळ बैठकीत कोरोनावर चिंता
मुंबई : कोविडचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याची गरज आहे. आपल्याला अधिक दक्षता बाळगून काटेकोर पाऊले उचलावी लागणार आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. टास्क फोर्सची बैठकही येत्या एक दोन दिवसात आयोजित करावी, असेही त्यांनी निर्देश त्यांनी दिले.
आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आपल्या सादरीकरणात जानेवारीच्या मध्याला कोविडच्या सक्रिय रुग्णात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली असून, लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे, असे सांगितले. काही दिवसांपूर्वी आपण दिवसाला 8 लाख डोसेस देत होतो, सध्या 5 लाख डोसेस दिवसाला दिल्या जातात. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करून आपापल्या जिल्ह्यात लसीकरण वेगाने होईल असे पाहण्याचे निर्देश दिले.
डॉ. व्यास यांनी अधिक माहिती देताना सांगितले की 8 डिसेंबर रोजी 6200 सक्रिय रुग्ण होते. मात्र, आज 10 हजार सक्रिय रुग्ण आहेत. एकूणच गेल्या 20 दिवसात सक्रिय रुग्णात 50 टक्के वाढ झाली असून, मागील सहा दिवसात रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाल्याची माहिती दिली. राज्यात पॉझिटिव्हिटी रेट 1.06 टक्के झाल्याचेही ते म्हणाले.
Post Views: 228