राजकारणाचं गुन्हेगारीकरण, डिसेंबरमध्ये राज्यभर उग्र आंदोलन करणार; चंद्रकांत पाटलांची घोषणा


 Sanjay M. Deshmukh  2021-11-18
   

मुंबई: राज्याचं गुन्हेगारीकरण झालं आहे. त्यामुळे राज्यभर 20 हजार सभा घेऊन जनजागृती करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य सरकारविरोधात डिसेंबरमध्ये राज्यभर उग्र निदर्शने करण्यात येणार आहेत, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. राज्यातील महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार, अंमलीपदार्थांचे समर्थन, व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आणि राजकारणाचे गुन्हेगारीकरण याबाबत जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी भाजप राज्यभर 20 हजार छोट्या सभांचे आयोजन करण्यात येईल. त्यानंतर डिसेंबरमध्ये मोठं आंदोलन करू, अस पाटील यांनी सांगितलं.

एसटी कामगारांचा संप भयावह

यावेळी त्यांनी एसटी कामगारांच्या संपावरूनही सरकारवर ताशेरे ओढले. सरकारने या कामगारांना केवळ अडीच हजार रुपये बोनस दिला. आपण घरातल्या कामवाल्या ताईलाही पाच हजार रुपये देतो. आम्ही कोविड असताना काम केलं. पण पगार झाला नाही, असं एसटी कामगार सांगत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप भयावह झाला आहे. कोर्टाने आवाहन करूनही त्यात फरक पडला नाही. सरकारने संवेदनशीलपणे हे प्रकरण हाताळावं असं कोर्टालाही वाटतं. हे भाजपचं आंदोलन वाटू नये म्हणून आम्ही या आंदोलनाचं नेतृत्व करत नाही. आम्ही त्यांना पाठबळ दिलं आहे. हे कामगारांचंचं आंदोलन राहिलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

दंगलीचं मूळ शोधा

मशीद पडण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्याची प्रतिक्रिया भिवंडी, नांदेड आणि अमरावतीत उमटली. दुसऱ्या दिवशी सर्व सामान्यांकडून स्वाभाविकपणे प्रतिक्रिया उमटली. आता अटकसत्रं सुरू आहे. पण याची सुरुवात कोणी केली हे शोधलं पाहिजे. याचं मूळ कुठं आहे हे शोधलं पाहिजे. मालेगाव जवळच्या मुस्लिम संघटनाच्या कार्यालयावर धाडी पडल्या आहेत. त्यातून काही गोष्टी जप्त झाल्या आहेत. त्यामुळे अनेक गोष्टी क्लिअर होतील, असं त्यांनी सांगितलं.

बोटचेपी भूमिका घेऊ नका

देवेंद्र फडणवीसांच्या काळात एकही दंगल झाली नाही. मुस्लिमांवर अन्याय होत होता असं नाही. त्यांनाही सन्मानाने वागवलं जात होतं. 95 टक्के मुसलमान दंगली वगैरेच्या विरोधात आहे. 51 टक्के मुसलमान समान नागरी कायदा येण्याच्या आधी त्या कायद्याप्रमाणे वर्तन करत होता. एक पत्नी आणि मुलांची संख्या मर्यादित ठेवून तो वागत होता. कारण तो शिकला. त्याला जग कळायला लागलं. पाच टक्के मुस्लिम दंगे करून 95 टक्के मुस्लिमांवर अशा गोष्टींचं लेबल लावत आहेl. हे चुकीचं आहे. यात सरकारने ठाम भूमिका घेतली पाहिजे. बोटचेपी भूमिका घेऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं.

    Post Views:  312


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व