पणजीः प्रत्येक राज्यात लोकसभा ते ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवणार असल्याची घोषणा शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पणजी येथे बोलताना केली आहे. भाजपची कोंडी करण्यासाठी शिवसेनेने केलेली ही खेळी असल्याची चर्चा सुरूय. आदित्य म्हणाले की, आम्ही गोव्यात 11 जागा लढवत आहोत. रिपोर्ट येत आहेत. ते फार बोलके आहेत. घरोघरी शिवसेना पोहोचली आहे. शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण घरोघरी गेलंय. शिवसेनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना म्हणून गोव्यात ही निवडणूक लढत असताना प्रत्येक राज्यात प्रत्येक स्तरावर निवडणूक लढणार आहे. विधानसभा, लोकसभा, जिल्हापरिषद आणि ग्रामपंचायतीची निवडणूक लढवणार आहोत. महाराष्ट्राच्या बाहेरही शिवसेनेची गरज जाणवत आहे. महाराष्ट्राचं मॉडल तिथे नेणार आहोत. उद्धव ठाकरे टॉप फाईव्हमध्ये आहे. हेच गुड गव्हर्नन्स मॉडल सर्वच राज्यात नेणार आहोत. शिवसेना म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देणारा पक्ष आहे. शिवसेना गोव्याला नवीन नाही, असा दावाही त्यांनी केला.
आम्ही मैत्री जपली…
आदित्य म्हणाले, मागच्या काळात भाजपसोबत युती होती. बाळसााहेबांची भावना होती. मित्रता असेल तर मैत्री स्वच्छ असली पाहिजे असं बाळासाहेबांना वाटायचं. मित्राला धोका होऊ नये. हिंदू मतात फूट पडू नये आणि आपल्यामुळे मित्राला अडथळा येऊ नये म्हणून आम्ही इतर राज्यात लढत नव्हतो. त्या काळात इतर पक्ष वाढत गेले. आमच्यातील काही शिवसैनिक त्यांच्या पक्षात गेले. खासदार आणि मंत्री झाले. तरीही आम्ही मैत्री जपायची म्हणून कुठेही लढलो नव्हतो.
त्यांनी खंजीर खुपसला…
आदित्य म्हणाले, गेल्या पाच वर्षात आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. आमच्याच नाही जे काही एनडीएचे मित्र पक्ष होते ते सर्व सोडून गेले. त्यामुळे ज्या ठिकाणी आमचं अस्तित्व होतं तिथं आम्ही लढायला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये लढत आहोत. मणिपूरमध्ये लढत आहोत. बिहार आणि बंगालमध्ये लढलो. सिल्वासामध्ये विजय मिळाला. आज गोव्यात लढत आहोत. जो काही आमचा कनेक्ट होता तो आहेच. तो फॉर्मली जनतेशी तो कनेक्ट करण्यासाठी आम्ही लढत आहोत. गोव्यात प्रत्येक गावात आम्ही शिवसेनेची शाखा उघडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भूमिपुत्रांना न्याय
आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसेना स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देणारा पक्ष आहे. ही निवडणूक पक्षाच्या भवितव्याबद्दल नाही. कोणत्याही राजकीय पक्षाच्या भवितव्याबद्दल नाही. ही निवडणूक गोंयकरांबद्दलची आहे. गेली दहा वर्ष भाजपची राज्यात सत्ता आणि केंद्रात सात वर्ष सत्ता. तरीही शाश्वत विकास नाही. दुर्गम भागात पाणी प्रश्न असता तर समजू शकलो असतो, पण मुख्य गोव्यात पाण्याचा प्रश्न आहे. मग कुणाचा विकास झाला. जनतेचा विकास झाला की काही पक्षाचा विकास झाला हा प्रश्न राहतोच, असा सवाल त्यांनी केला.
Post Views: 211
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay