घोषणांचा पाऊस आणि गरीबांची क्रूर थट्टा करणारा अर्थसंकल्प! : संजय एम.देशमुख


 संजय देशमुख  03 Feb 2022, 6:04 PM
   

नेमेची येतो पावसाळा आणि ओलेचिंब  करूनी शमवितो उन्हाळा
या प्रमाणेच स्वप्नवत बजेट सादर होत असते. त्याचप्रमाणे यावर्षीही अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी निर्मल भावनांनी देशाचे बजेट सादर केले. आता ते ओठात एक आणि पोटात एक याप्रमाणे खरोखर निर्मला मनाने सादर केलेले आहे की, नुसती ठरल्याप्रमाणे नेहमीची स्वप्ननगरीचीच सैर आहे, याचे अनुभव संबंध वर्षभरात येत राहणार आहेतच. परंतू त्याच्या आजच्या पाऊलखुणांनी मात्र हे अंदाजपत्रक सर्वसामान्यांची घोर अवहेलना करून फक्त उद्योगपतींसाठी रेड कारपेट अंथरणारे असल्याचे स्पष्ट होते आहे. मागील वर्षात कोटींमध्ये रोजगार देण्याचा संकल्प करून उलट लाखो लोकांना बेरोजगारीच्या वेदना भोगाव्या लागत आहेत. मागचे संकल्प म्हणजे शुद्ध दिवास्वप्न म्हणून सिद्ध झाले आहेत. त्यामुळे गतकाळातील आश्वासनांची काय परिपूर्ती केली हे न सांगता यावर्षात परत 60 लाख रोजगार देण्याची भिमगर्जना निर्मलाबाईंनी केलेली आहे. बेरोजगारीच्या वणव्यात होरपळून अन्नाविना किती गेलेत हे आकडे स्पष्ट करण्याचे धाडस लपवाछपवीचे खेळ खेळणार्‍या मोदी सरकाला कधीच करता आलेले नाही. त्यामुळे मागील संकल्पपूर्तीबद्दल अवाक्षरही न काढता शिरस्त्याप्रमाणे नव्या घोषणा करून संसदेत आपल्याच दावणीला बांधलेल्या बहुमतांच्या टाळ्या घेण्याच्या पराक्रमातच आनंद माणण्यात आला. 
महात्मा गांधींच्या नावाने रोजगार हमी चालविताना ग्रामीण भागातल्या तळागाळातील जनतेच्या जीवनात प्रकाश कसा आणता येईल याचा विचार ना गेल्या काळात झाला ना आताच्या अर्थसंकल्पातही! म्हणून हा आठवा अर्थसंकल्प आठवतानाच मध्यमवर्गीयांना श्रमिक, बेरोजगारांना अहोरात्र चिंतेच्या मार्गानेच आणखी प्रवास करावा लागणार आहे. कोट्यावधींच्या आकड्यांचे बजेट सादर करणे म्हणजे त्याबाबत अनभिज्ञ असलेल्या कोट्यावधी सर्वसामान्यांची घोषणांच्या पावसात समजून उमजून दिवसाढवळ्या फसवणूक करण्यासारखे आहे. कारण हे मोठमोठे आकडे फक्त निर्मलाबाईच सादर करून शकतात, परंतू ते समजून घेऊन त्याचे विश्लेषण करण्याची कुवत रिंग मास्टरच्या दरार्‍याने फक्त टाळ्या वाजविणार्‍या किती संसद सदस्यांमध्ये आहे, याचेही सर्वेक्षण जर केले तर या प्रश्नपत्रिकांमध्ये भोपळेच अधिक दिसतील. म्हणून ज्या ज्यावेळी बजेटचा विषय येतो, त्यावेळी आम्हाला प्रमोद नवलकरांची आठवण येते. कारण या बजेट विषयाचे एक चिंतनिय विदारक आणि तेवढीच मनोरंजक वास्तवता त्यांनी आपल्या एका लेखातून विषद केली होती. याबाबत बोलताना नवलकर म्हणाले होते. मी राज्याचा अर्थमंत्री होतो आणि बजेट सादर करण्याची जबाबदारी माझेकडे आली. कोट्यावधींचे गरगरते आकडे सादर करण्याची माझी ही पहिलीच वेळ होती. परंतू या अर्थसंकल्पाच्या विषयाबद्दल प्रत्यक्ष लोकप्रतिनिधींमध्येच किती उदासिनता आणि अज्ञान असते याचा वास्तव अनुभव माझ्या बजेट सादरीकरणातून मला आला. मोठ्या थाटात मी बजेटची बॅग घेऊन दाखल झालो आणि आकड्यांची घोषणा करता करता लाखांचे आकडे कोटीत आणि कोटींचे आकडे लाखात वाचून मोकळा झालो. परंतू काय आश्चर्य! उपस्थित लोकप्रतिनिधींनी माझे टाळ्यांच्या कळकडाटात स्वागत केले. एका अभ्यासू आणि अवलोकन निरीक्षण करणार्‍या साहित्यप्रेमी, भ्रमंतीकार मंत्र्यांच्या या उदाहरणावरून काय समजायचे ते समजून जावे. परंतू त्यांचीच परिस्थिती अशी आहे, तर करोडो सामान्य नागरीकांना बजेटमधलं काय समजणार आणि त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न तरी एकदा अर्थसंकल्प वाचून मोकळे झाल्यावर कोणी करणार का? किंवा त्यातील एक एका तरतुदीचा कसा विनियोग केला गेला ही गोष्ट उदार तथा निर्मल अंतःकरणाने जनतेच्या दरबारात सादर करण्याचा प्रामाणिक  प्रयत्न पंतप्रधान, अर्थमंत्री आणि त्यांचे सहकारी मंत्री कधी तरी करणार का? सर्वसामान्य जनतेप्रति बांधिलकीच्या भावनेने एवढी प्रामाणिकता आणि नितिमत्ता शिल्लक असती तर याच अर्थसंकल्पात मागील स्वप्नांची परिपूर्ती कशी झाली हे मांडण्याचे सुद्धा धाडस निर्मलाबाईंना करता आले असते. एक प्रकारे आताचे बजेट म्हणजे ही हट्टी, दुराग्रही आणि हिलटरी वृत्तींच्या सरकारने गरीबांची केलेली क्रुर थट्टा आहे. या लोकशाहीशी प्रतारणा करण्याच्या वृत्तीचीच ही वाटचाल आहे. त्यामुळेच गेल्या दोन वर्षाच्या तथाकथीत अलभ्य लाभाच्या कोरोना पर्वामध्ये लस बनविणार्‍या कंपन्यांपासून विविध भांडवलदारांना लोकांना लुटण्याचे कुरण मोकळे करून देण्यात आले. मात्र दुसरीकडे तपासण्यांच्या सदोष यंत्रणातून नकली पॉझिटीव्हचे आकडे वाढवत बंधने लादत सर्वसामान्यांचे रोजगार हिरावून त्यांना घरात डांबून ठेवण्याचे राजकारण या सरकारने केले आहे. त्यामुळे निवडणूका आणि कार्यक्रम करणार्‍या राजकीय नेत्यांना गर्दी जमवण्यासाठी मैदान मोकळे आणि सर्वसामान्यांना दंडुक्यांच्या प्रहाराने घरात डांबून ठेवण्याचे पापी कारनामे हा या सरकारचा षड्यंत्री खेळच ठरलेला आहे. उंदरा मांजराप्रमाणे प्रयोग करून अति औषधांच्या मार्‍यांनी लोकांचे मृत्यू होऊन ते आकडे कोरोनामध्ये परावर्तित करण्यात आले. 
गेल्या दोन वर्षात 84 टक्के कुटूंबाचे उत्पन्न कमी झाले आहे. जे दरडोई उत्पन्न 2019-20 मध्ये 1,08,645 होते तेच उत्पन्न घटून आता 1,07,801 इतके किंवा त्याहूनही खूप कमी झालेले आहे. यामुळे जागतिक भुक निर्देशांकात आज भारत 101 व्या क्रमांकाचा मानकरी आहे. तरीही आपले सरकार मोठमोठ्या भिमगर्जना करून आता अर्थसंकल्पातून घोषणांच्या स्वप्नवत पाऊसामध्येच सर्वसामान्यांना भिजवत ठेऊन बेसावध ठेवण्याचे प्रयत्न करीत आहे. कारण नुसती निवडणुक एके निवडणुक या महत्वाकांक्षामध्येच मोदी फार गुरफटलेले असल्याने त्यांना देशातील गोरगरीब, बेरोजगार आणि सामान्य जनतेच्या जीवनमानाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. फक्त परदेशातील व्यासपिठावर खोट्या टाळ्या घेण्यातच आपले कर्तृत्व 100 टक्के सिद्ध झाल्याच्या पोकळ अभिमानाचं आनंद वाटतो, हे आता देशवासियांच्या लक्षात आलेले आहे. थोडक्यात ढोंग आणि जादुचे खेळ करून लोकांना संमोहनात अडकवून ठेवणारे करामती जादुई सरकार हीच मोदी आणि त्यांच्या सरकारची ईतिहासातील ओळख राहणार आहे.  एकंदरीत सर्वसामान्यांचा हक्काचा अन्नाचा घास, हिसकणारे, कोट्यावधी बेरोजगारांच्या नोकर्‍या हिरावणारे आणि केवळ प्रसिद्धीच्या मागे लागून अभ्यासाशिवाय अज्ञानापोटी अकस्मात चुकीचे निर्णय लादून सर्वसामान्य आणि देशाच्या अन्नदात्यांच्या जीवनात अंधःकार निर्माण करणारे हे अयशस्वी सरकार म्हणजे देशाच्या वाट्याला आलेला एक दैवदुर्विलास आहे. तो कधी आणि कसा निस्तरला जावा या चिंतनिय परिस्थितीवर विजय मिळविण्याचे उसणे बळ आता जनतेला निर्माण करावे लागणार आहे. अन्यथा हा लवकर न संपणारा अध्यायच ठरणार आहे!
संजय एम.देशमुख, मोबा.क्र.९८८१३०४५४६ 

    Post Views:  387


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व