अकोला - भारत निवडणूक आयोगातर्फे राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा कालावधी वाढविण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने आता पुन्हा ५ डिसेंबर २०२१ पर्यत पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे. अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली. मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगातर्फे १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्या आधारावर ५ जानेवारी २०२२ रोजी विधानसभा मतदारसंघांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्याच मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी वापरण्यात येणार असून, त्याबाबत विविध माध्यमातून जनजागृतीही करण्यात आली आहे; परंतु आगामी निवडणुकांची मोठी संख्या लक्षात घेता संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमास मुदतवाढ देण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्फत भारत निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार या कार्यक्रमास ५ डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमास मुदतवाढ मिळाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने आता पुन्हा १ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांना ५ डिसेंबर २०२१ पर्यंत मतदार यादीत नावे नोंदविण्याची संधी प्राप्त झाली आहे. ऑनलाईन पद्धतीनेदेखील www.nvsp.in या संकेतस्थळावर नाव नोंदविणे, नावाची पडताळणी करणे किंवा नावांतील,पत्त्यांतील तपशिलांत दुरुस्त्याही करता येतील. त्यासाठी विधानसभा मतदरसंघांच्या १ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांतील आपल्या नावांचीही खात्री करुन घ्यावी. नाव नसल्यास ते त्वरीत नोंदवून घ्यावे; तसेच विहित पद्धतीने मृत व्यक्तीची किंवा दुबार नावेदेखील वगळावित, असे आवाहनही मदान यांनी केले आहे.
Post Views: 195
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay