काँग्रेस नेत्या ॲड. यशोमती ठाकूर यांनी भाजपा नेत्यांना खोचक टोला लगावला आहे. रामराम म्हटलं की आपुलकी असते, जय श्री राम म्हटलं की राजकारण असतं असं म्हणत निशाणा साधला आहे. "रामाच्या नावाने खूप राजकारण सध्या देशात होत आहे. मी तर कशालाच आणि कोणालाच घाबरत नाही. माझ्या समोर खुद्द पंतप्रधान जरी आले तरी रामरामच म्हणणार असल्याचं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं आहे.
मोझरीमध्ये राम मंदिर आहे. रामाच्या नावाने खूप राजकारण सध्या देशात होत आहे. माझ्या घरातील मंदिर 400 वर्ष जून आहे. मी कधीच रामाच्या नावाने राजकारण केलं नाही आणि करणार नाही कारण ती भक्ती आहे. रामराम म्हटलं की आपुलकी असते आणि जयश्री राम म्हटलं की ते राजकारण असतं. मी तर कशालाच घाबरत नाही आणि कोणालाच घाबरत नाही. माझ्या समोर खुद्द पंतप्रधान आले तरी मी तरी रामरामच म्हणणार. रामाची भक्ती हीच महत्त्वाची आहे" असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं. एका कार्यक्रमात त्यांनी असं म्हटलं आहे.
काम क्वालिटीचं दिसलं नाही तर डोकं फोडेन
यशोमती ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरल्याची घटना समोर आली होती. काम क्वालिटीचं दिसलं नाही तर अधिकाऱ्यांना त्यांनी डोकं फोडेन असा इशारा दिला होता. ठाकरे सरकारमध्ये यशोमती ठाकूर मंत्री होत्या. तसेच त्या अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. ठाकूर याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता.
यशोमती ठाकूर यांचा अधिकाऱ्यांना इशारा
यशोमती ठाकूर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आपण या कामात पैसे घेतले का? असा सवाल केला होता. तसेच या रस्त्याचे काम व्यवस्थित न केल्यास डोकं फोडण्याचा इशारा देखील दिला होता. यावर अधिकारी वर्ग काही वेळ शांत राहतो. अमरावती जिल्ह्यातील एका ठिकाणी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करताना त्यांनी हा इशारा दिल्याचं म्हटलं होतं.
Post Views: 391