मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पलटवार केला आहे. शरद पवारांवर बोलणार्या फडणवीसांना यापूर्वी पवारांनी कात्रजचा घाट दाखवला होता आणि आताही बोलत राहिले तर पवारसाहेब काशीचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा खोचक टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. फडणवीसांच्या या विधानावरून नवाब मलिक यांनी त्यांना फटकारले आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना फडणवीस कधी विधानसभेत सदस्य म्हणून निवडून आले नाहीत. कालपर्यंत राज्यात 25-30 जागा निवडून येत होत्या ते पवारसाहेबांवर भाष्य करत आहेत. याअगोदरही पवारसाहेबांवर फडणवीस भाष्य करत होते. त्यावेळी काय झाले याची आठवणही नवाब मलिक यांनी फडणवीस यांना करुन दिली आहे.
यावेळी त्यांनी गोव्यातील राजकीय घडामोडींवरही भाष्य केलं. शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी उद्या गोव्यात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि मंत्री जितेंद्र आव्हाड जाणार आहेत. उद्या शिवसेनेसोबत जी अंतिम चर्चा होईल, तो निर्णय गोव्यात प्रफुल पटेल जाहीर करतील, अशी माहिती त्यांनी दिली.
उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत आघाडी झाली आहे. मणिपूरमध्ये काँग्रेससोबत आघाडी झाली आहे. गोव्यात स्थानिक पातळीवर काँग्रेसने आघाडी न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी चर्चा सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोव्यातील आघाडीवरून काँग्रेसवर टीका केली होती. ज्या जागा राष्ट्रवादीला हव्या होत्या त्या सोडायला काँग्रेस तयार नाही. काँग्रेस गोव्यातील मोठा पक्ष आहे. काँग्रेस अनेक वर्ष सत्ताधारी पक्ष होता. मागच्यावेळी त्यांना सर्वाधिक जागा मिळाल्या. 17 आमदार त्यांचे निवडून आले होते. आता त्यांच्याकडे दोन तीन आमदार राहिले आहेत. त्यांना वाटतं लोकांचा पाठिंबा अजून त्यांना आहे. असेल तर दिसेल. आम्हाला वाटत होतं की, काँग्रेसने 40 पैकी 30 जागा लढाव्यात. उरलेल्या दहा जागा शिवसेना, राष्ट्रवादी आणि त्यांचा मित्र पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डला द्याव्यात असं आम्हाला वाटत होतं. या दहा जागांवर आमचं समाधान झालं होतं, असं राऊत म्हणाले होते.
Post Views: 274
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay