तेली समाजाच्या विविध मागण्या शासनाने मान्य कराव्यात - प्रकाश डवले


\'संत संताजी जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळाला\' भरीव निधी देण्याची मागणी
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  13 Jul 2026, 11:56 AM
   

अकोला : "तेली समाज हा केवळ एक समाज नसून या महाराष्ट्राच्या मातीशी, संस्कृतीशी आणि अर्थव्यवस्थेशी जोडलेला एक अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू आणि स्वाभिमानी घटक आहे. अंधाराचा नाश करण्यासाठी जशी तेलाच्या दिव्याची गरज असते, तशीच समाजाच्या उन्नतीसाठी संत संताजींच्या विचारांची गरज आहे," असे प्रतिपादन राज्य तेली समाज समन्वय समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत मुंबई येथे करण्यात आले. या परिषदेत समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण, संघटन आणि आर्थिक उन्नती या त्रिसूत्रीवर भर देत विविध महत्त्वपूर्ण मागण्या मांडण्यात आल्या.
      या पत्रकार परिषदेला राज्य तेली समाज समन्वय समिती महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रकाश डवले , सरचिटणीस प्रशांत शेवतकर , उपाध्यक्ष एड. किशोरजी लांजेवार गोंदिया, पुणे जिल्हाध्यक्ष हिरामणजी सांगे, मुंबई जिल्हाध्यक्ष घनश्यामजी बोराखडे आणि नागपूर जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत डवले , ॲड संजय शेलोकार नागपूर यांच्यासह अनेक मान्यवर व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     संत संताजी जगनाडे महाराजांचा वारसा -
पत्रकार परिषदेत बोलताना वक्त्यांनी तेली समाजाच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत मावळे आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे विचार आपल्या लेखणीतून जिवंत ठेवणारे 'परमवीर' संत संताजी जगनाडे महाराज हे तेली समाजाचे सर्वात मोठे दैवत आणि आदर्श आहेत, असे सांगत त्यांनी दिलेली प्रामाणिकपणाची व भक्तीची शिकवण आजच्या काळातही तितकीच प्रेरणादायी असल्याचे स्पष्ट केले. विदर्भ, मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात तेली समाज मोठ्या संख्येने असून राज्याच्या राजकारणात आणि जडणघडणीत नेहमीच निर्णायक राहिला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
     तेली समाजाच्या प्रमुख मागण्या: आधुनिकतेच्या युगात पारंपरिक व्यवसाय संकटात सापडल्याने आणि तरुण पिढी शिक्षणासाठी संघर्ष करत असल्याने, शासनाने खालील मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे:
    शहरांमध्ये वसतीगृहांची सोय: ग्रामीण भागातील मुला-मुलींना उच्च शिक्षणासाठी मुंबई, नागपूर आणि पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये हक्काची आणि परवडणाऱ्या दरातील वसतीगृहे उपलब्ध करून देण्यात यावीत.
     महामंडळाला भरीव निधी: शासनाने जाहीर केलेले 'संत संताजी जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ' निर्माण केले, त्याला भरीव निधी देऊन तातडीने कार्यान्वित करावे.
     योग्य प्रतिनिधित्व: तेली समाजाच्या लोकसंख्येचा विचार करता, शासन आणि प्रशासनाच्या विविध मंडळांवर समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे.      पारंपरिक उद्योगाला आधुनिकतेची जोड: पारंपरिक तेल घाणी उद्योगाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी शासनाने विशेष अनुदान योजना सुरू करावी. "आम्ही आजपर्यंत प्रामाणिकपणे कष्ट केले आहेत. पण आता शिक्षण, संघटन आणि आर्थिक प्रगती या सूत्रांचा वापर करून हक्कासाठी एकजुटीने शासनास विनंती करून मागण्या मान्य करण्यासाठीचा प्रयत्न आहे."- प्रकाश डवले अध्यक्ष राज्य तेली समाज समन्वय समिती महाराष्ट्र
      पत्रकार परिषदेचा समारोप 'जय संताजी, जय महाराष्ट्र' या घोषणेने अत्यंत उत्साहात झाला. समाजाच्या या सकारात्मक आणि न्याय्य मागण्यांना शासनाकडून त्वरित प्रतिसाद मिळेल, अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली.

    Post Views:  1


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व