कुलरच्या हवेने आजोबा नातवाचा जीव घेतला? आजीसह अन्य एकाची प्रकृती गंभीर


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  27 Apr 2022, 8:45 PM
   

नाशिक : नाशिकच्या महडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरात कुलरजवळ ठेवलेल्या किटकनाशक औषधांचा द्रव कुलरच्या हवेतून खोलीत पसरल्यामुळे एकाच कुटुंबातील चार जणांची प्रकृती अचानक बिघडली का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. कारण याठिकाणी खोलीत झोपलेल्या आजोबा आणि नातवाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर आजी व अन्य एकजण गंभीर आहे. मग या कुटुंबाला कुलरमधून मृत्यूची हवा मिळाली का? यासह एक ना अनेक संभाव्य तर्कविर्तकांना बागलाण तालुक्यात उत आला आहे. दरम्यान, आजोबा व नातवाच्या मृत्युचे कारण शोधण्यासाठी त्यांचे नमूने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून इकडे आजी व अन्य एका जणाची मृत्यूशी सुरु असलेली झुंज कायम आहे. या धक्कादायक प्रकाराने सध्या परिसर हादरून गेला आहे.

नेमका प्रकार काय घडला?

याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, बागलाण तालुक्यातील महड येथे दहा दिवसांपूर्वी शेतशिवारात एक कुटुंब वास्तव्यास आहे. दिवसभराची दिनचर्या आटोपून हे कुटुंब रात्रीची जेवणावळी आवरुन झोपण्यासाठी गेले. त्यात आजी, आजोबा, नातू अन्य एकजण पत्र्याच्या खोलीत कुलरच्या हवेत झोपले. कुटुंबातील अन्य सदस्य घराबाहेर मोकळ्या हवेत झोपले होते. मात्र सकाळी खोलीत झोपलेल्या चौघांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान, चौघांना नेमके काय झाले? याचे कारण स्पष्ट होत नसल्यामुळे त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता, उपचारादरम्यान नातवाचा मृत्यू झाला तर आजोबाचा पुणे येथील सैनिकी रुग्णालयात उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. यापैकी आजी व अन्य एकजण व्हेंटिलेटरवर नाशिक जिल्हा रुग्णालयात मृत्यूंशी झुंज देत आहेत.

नेमका मृत्यू कशामुळे?

मात्र या चौघांना काय झाले? याचे कारण अद्याप स्पष्ट न झाल्याने वैद्यकीय पथकाने घटनास्थळी येवून सर्व संशयास्पद वस्तुंचे नमूने तपासून पाहिले आहेत. या तपासात रात्री जे कुलर सुरु करण्यात आले होते. त्या कुलरच्याजवळ शेतीपिकांवर फवारणी करावी लागणारी विषारी औषधे व रासायनिक खत ठेवलेले आढळून आले आहेत. त्यामुळे कुलरची हवा त्यात किटकनाशकातून निघालेले द्रव व खोलीचा बंद असलेला दरवाजा यामुळे खोलीत नॅट्रोजनचे प्रमाण अधिक वाढल्यामुळे या चौघांची प्रकृती बिघडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. अशी माहिती बागलाण तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र अजून यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला नाही. या घटनेत आजोबासह तीन वर्षाच्या नातवाचा मृत्यू झाला असून या चौघांची प्रकृती बिघण्यामागे मृत्यूची हवा कारणीभूत ठरली असेल का? याबाबत संपूर्ण बागलाण तालुक्यात तर्कविर्तकांना उत आले आहे.

    Post Views:  312


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व