चुकीच्या पध्दतीने केलेल्या प्रभाग रचनेविरोधात न्यायालयात जाणार : गणेश नाईक


 संजय देशमुख  05 Feb 2022, 12:25 PM
   

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी करण्यात आलेली प्रभाग रचना  चुकीच्या आणि नियमबाह्य पध्दतीने झाली असून त्याविरोधात भाजप न्यायालयात जाणार आहे. राजकीय फायद्यासाठी जनतेची गैरसोय केल्याचे या प्रभाग रचनेतून दिसून येत आहे, असा आरोप भाजप आमदार गणेश नाईक यांनी केला आहे. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक एप्रिल 2022 मध्ये होणे अपेक्षित आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी पालिका क्षेञात 11 नविन प्रभागांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण प्रभागांची संख्या 111 वरून 122 वर गेली आहे. सोमवारी मध्यरात्री ही नविन प्रभाग रचना महापालिका प्रशासनाने पालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड केली. 

सत्ताधारी राजकीय पक्षांच्या दबावाखाली चुकीची प्रभाग रचना केली

नविन प्रभाग रचनेवर तीव्र आक्षेप घेत आमदार गणेश नाईक यांनी प्रभाग रचना करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सत्ताधारी राजकीय पक्षांच्या दबावाखाली या पक्षांना लाभ पोहोचविण्यासाठीच प्रभाग रचना चुकीच्या पध्दतीने केल्याचा आरोप केला आहे. यामध्ये पालिकेचे अधिकारी आणि प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी सामिल आहेत. शहराच्या एकूण लोकसंख्येला एकूण प्रभागांनी भागून जे उत्तर येईल तेवढी सरासरी लोकसंख्या एका प्रभागाची असायला हवी होती. मात्र संबधित अधिकाऱ्यांनी सत्ताधारी राजकीय पक्षांना लाभ पोहोचविण्यासाठी प्रभाग रचनेचे चुकीचे गणित केले आहे. पालिका निवडणुकीच्या संभाव्य प्रभाग रचनेत बेकायदा काम होण्याची शक्यता नाईक यांनी राज्यपाल, निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त या सर्वांना अगोदरच वेळोवेळी पत्र पाठवून व्यक्त केली होती. तरी देखील प्रभाग रचनेमध्ये हेराफेरी झाल्याने याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

दोषींवर कायदेशीर कारवाईची मागणी

पालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी राजकीय दबावापोटी चुकीची आणि नियमबाह्य प्रभाग रचना केली आहे, त्यांची चौकशी करावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. नविन प्रभाग रचनेत तीन तीन किलोमीटरचे प्रभाग तयार झाले असून त्यामुळे जनतेची प्रचंड गैरसोय होणार आहे. राजकीय फायद्यासाठी नियम डावलून ही प्रभाग रचना तयार करण्यात आली असल्याचे नाईक म्हणाले.

    Post Views:  247


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व