पंढरीचा निष्ठावंत वारकरी हरपला - महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर
अमरावती: हरिभक्त परायण गुरुवर्य वैराग्यमूर्ती रंगराव महाराज टापरे यांचे आज अमरावती येथे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पंढरीचा एक निष्ठावंत वारकरी वैराग्यमूर्ती हरपला असल्याची भावना व्यक्त करीत महिला व बालविकास मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आपल्या शोकभावना प्रकट केल्या आहेत.
रंगराव महाराज ठाकरे यांच्या अंत्यविधीसमयी मंत्री श्रीमती ठाकूर आवर्जून उपस्थित होत्या.
ह भ प गुरुवर्य रंगराव महाराज टापरे आखतवाडा येथील रहिवासी होते. गेल्या अनेक वर्षांपासून कौंडण्यपूर धामाचे ते निष्ठावंत वारकरी म्हणून कार्यरत होते. रंगराव महाराजांचे वारकरी संप्रदायामध्ये मोठे योगदान आहे कौंडण्यपूर धामामध्ये वारकरी संप्रदाय याचा प्रचार करण्यात आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण करून समाजात शांतता आणि सलोखा बळकट करण्यात रंगराव महाराज यांचा सिंहाचा वाटा होता. रंगराव महाराज यांचे आध्यात्मिक ज्ञान आणि पंढरपुराप्रती असलेली अखंड निष्ठा पाहता त्यांना वैराग्यमूर्ती म्हणून मानले जात असे. रंगराव महाराज यांच्या जाण्याने समाजाचे आणि आध्यात्मिक वर्गाचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या स्मृती नेहमी जागवल्या जातील, असे उद्गार मंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी काढले.
Post Views: 270