संपावर तोडगा काढण्यासाठी एसटी कर्मचारी बैठकीला तयार
मुंबई : गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचार्यांचा संप सुरू आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी मागील आठ दिवसांपासून मुंबईत एसटी कर्मचार्यांच्या बैठका सुरू आहे. या बैठकीत सरकारसोबत बातचीत करून मार्ग काढण्यासाठी एसटी कर्मचारी तयार आहेत, अशी माहिती समोर येत आहे.
गेल्या आठ दिवसांपासून मुंबईत आलेल्या एसटी कर्मचार्यांच्या गुप्त बैठकीचे सत्र अखेर संपले. कर्मचार्यांकडून संपावर मार्ग काढण्यासाठी मागील आठ दिवसांपासून कर्मचार्यांच्या बैठकीचे खलबतं सुरू होती. या बैठकीसाठी उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक आगारातील दोन एसटी कर्मचारी आले होते. या बैठकीत कर्मचार्यांकडून संपाचा तिढा सुटावा म्हणून सरकारसमोर काही मागण्या समोर ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगाराची हमी सरकारने द्यावी, सर्व कर्मचार्यांवरील कारवाई मागे घ्यावी यासोबत शिस्त आवेदन कार्यपद्धतीतील जाचक अटी रद्द करण्यात याव्या आणि इतर अनेक मागण्या करण्यात आल्या आहे. सरकारसोबत बातचीत करुन मार्ग काढण्यासाठी कर्मचारी तयार आहेत.
एसटी कर्मचार्यांचा संप अद्यापही सुरू असून, कर्मचारी संपावर ठाम आहे. अनेक आगारात अजूनही काही एसटी कर्मचारी कामावर हजर झालेले नाहीत. त्यामुळे प्रवासी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागतोय. एसटी विलीनीकरणाबाबतची भूमिका सरकारने स्पष्ट केली आहे की विलीनीकरण शक्य नाही. आता त्यामध्ये सुधारणा अशी आहे की न्यायालयातून त्याबाबत समिती नेमून त्या समितीची भूमिका आम्ही मान्य करू, असे सरकारने सांगितले आहे. त्यामुळे सध्या एसटी विलीनीकरणाबाबतचा प्रश्न आता न्यायप्रविष्ट आहे.
Post Views: 350